Thursday, December 4, 2008

मुंबईच का?

मुंबईच का? दहशतवादी मुंबईलाच पुन्हा पुन्हा का लक्ष्यं करतात याचं साध आणि सोपं उत्तर जे सर्वांना माहित आहे आणि ते म्हणजे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन पाहिले तर मुंबईवर हल्ला केला म्हणजे सारा देश सैरा वैरा धावत सुटतो. कारण या मुंबापुरीत देशाच्या सर्वच दिशांमधून, सर्वच बाजूंनी आणि अनेक काना कोप-यांतून मोठ्या उद्योगपतीपासून ते छोटाशा पॉलिथीन गोळा करणा-यापर्यंत सर्वच आसरा शोधत येतात. यापुढेही येणार. मुंबईमध्ये दहशवाद्यांनी बॉमबस्फोट घडवला, गोळीबार केला किंवा 26/11 सारखं हत्याकांड केलं तर त्याचे पडसाद सर्वच राज्यांच्या राजधानीतच नव्हे तर बिहार, उत्तर प्रदेशसकट सर्वच राज्यातील छोट्या गावांमध्येही उमटतात. कारण पोटाची खळगी भरण्यासाठी देशाभरातील प्रत्येक खेड्यातून एक तरी व्यक्ती मुंबईच्या कुशीत उब मिळवायला आली आहे. असं म्हणतात की मुंबईत माणूस सकाळी उपाशीपोटी उठू शकतो मात्र तो कधीच उपाशी पोटी झोपत नाही. आणि हेच नेमकं दहशतवाद्यांनी हेरलय. देशभरातील विविध भागांमध्ये वेगवेगळे बॉम्बस्फोट घडवून वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा मेंदूवरच वार करून सा-या शरीरामध्येच वेदनांचा प्रलय निर्माण करण्याचा राजमार्गच जणू दहशतवाद्यांना सापडलाय. एखाद्या राजाचा जीव पोपटात असल्यानंतर त्या राजाला मारण्यासाठी युद्ध छेडण्याची गरज नसते, तर त्या पोपटाची मान मुरगळणे पुरेसे असते, त्याप्रमाणेच भारताचं मुंबईच्या बाबतीत झालय. मुंबईवर वार केला की सा-या देशालाच जखमा होतात. त्यामुळे मुंबई हे दहशतवाद्यांचे साधे आणि सोपे लक्ष्यं बनलय. मुंबईवर हल्ला झाला की खेड्यापाड्यातील आईवडील आपल्या मुलाच्या आणि नातेवाईकांच्या सुरक्षेच्या चिंतेच्या आगीने होरपळून निघतात. काळजीनं व्याकूळ होतात. यालाच दहशतवाद म्हणतात. देशभरात काळजी आणि भीती पसरवण्याचे दहशतवाद्यांना मुंबई नावाचे साधे आणि सोपे साधन मिळाले आहे. आणि याच साधनांचा ते वारंवार वापर करतात. याची सरकारलाही पुर्ण जाणीव आहे मात्र मुंबईच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. दहशवादी हल्ल्यांच्या मुद्याने आता संपुर्ण देशाला वेठीस धरलय. तर मुंबईकर जसा काही निखा-यांवर चालत आहे. 26/11च्या हल्ल्यांना आठवडा उलटल्यानंतरही दहशतवाद्यांनी पेरलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी पोलिसांना जीवाचं रान करावे लागत आहे. त्यामुळं दहशतवादी नसले तरी मुंबईवर त्यांची दहशत कायम आहे.

Wednesday, November 12, 2008

रोझा पार्क ते बराक ओबामा आणि भारत


रोझा पार्क बसल्या म्हणून मार्टीन लुथर किंग ज्यूनिअर चालू लागले, मार्टीन चालले म्हणून ओबामा धावले आणि ओबामा धावले म्हणून पुढची पीढी आता आकाशात भरारी घेईल. (बसमधून प्रवास करतांना अमेरिकेत कृष्णवर्णीयांना गौरवर्णीयांच्या जागेवर बसून प्रवास करण्यास मनाई होती. मात्र रोझा पार्क या महिलेनं आपल्या जागेवरून उठण्यास नकार दिल्यानं अमेरिकेत पन्नासच्या दशकात वंशवादाच्या विरोधात एक ठिणगी पडली. याच ठिणगीतून जॉन एफ केनेडी, त्यांचे छोटे बंधू आणि मार्टीन ल्यूथर किंग यांनी क्रांतीचा वणवा पेटवला. ) ही आहे गेल्या पन्नास वर्षातली मानवाच्या आणि मानवतेच्या सन्मानार्थ अमेरिकेन जनतेने केलेली वैचारीक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाची वाटचाल आणि भविष्यातले आणखी एक क्रांतीकारी परिवर्तनाचे पाहीलेले स्वप्न देखील. सध्या अमेरिकेन जनता याच विचारात गुंतली आहे. आणि बराक हुसेन ओबामा यांना देशाच्या अध्यक्षपदावर बसवून अमेरिकेच्या जनतेने हा विचार वास्तवात रुजवलाय. तसेच जात, धर्म, वंश आणि वर्णाच्या भिंतींमध्ये दुंभगलेल्या राष्ट्रांसाठी एक नवा आदर्शदेखील निर्माण केला आहे. मात्र एक भारतीय म्हणून अमेरिकेच्या वर्तमान आणि इतिहासाकडे पाहिले तर अमेरिकेची भारताशी तुलाना करण्याचा हव्यास टाळता येत नाही. अमेरिकेला तिनशे वर्षांचा इतिहास आहे. तर भारताला दोन हजारांपेक्षा जास्त वर्षांचा. मात्र भारताला मानवतेस काळीमा फासणा-या वर्ण व्यवस्थेला बळी पडलेल्या शोषितांचा ह्रदयद्रावक भूतकाळ आहे, तर अमेरिकेलाही वंश व्यवस्थेला बळी पडलेल्या माणसाला आणि माणुसकीला गुलामगिरीच्या साखळदंडात जोखडल्याच्या काळ्या आठवणी चिकटल्या आहेत. सध्या मात्र दोन्ही राष्ट्र लोकशाहीची मुल्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतांना दिसतात. अमेरिका हे जगातील सर्वात ज्येष्ठ लोकशाही राष्ट्र आहे, तर भारत हे सर्वात मोठं. मात्र लोकशाहीच्या माध्यमातून अमेरिकन जनतेला देशाचे नेतृत्व स्विकारण्यासाठी जी प्रगल्भता अडीचशे वर्षात आली ती भारताला फक्त पाच दशकात लाभली. मात्र याचा अर्थ असा नाही की भारताची जनता सर्वाथानं परिपक्व आणि जागरूक आहे. उलट बराक ओबामा यांच्या विजयामुळं भारताच्या जनतेकडून आता अपेक्षा उंचावल्या आहेत. कारण ओबामा यांना अमेरिकन जनतेनं नुसते कृष्ण वर्णीय म्हणून स्विकारले नाही, तर अमेरिकेन जनतेला 21 व्या शतकातील नव्या युगात एका नव्या दमाच्या तरूण नेतृत्वाची गरज होती. जी त्यांनी प्रखर राष्ट्रवाद जपणा-या आणि देशासाठी प्रसंगी प्राण त्यागण्याची तयारी ठेवणा-या सत्तर वर्षीय जॉन मॅकेन यांचा पराभव करून व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतीयांनी ओबामांचा विजय हा फक्त जात, धर्म आणि वंश परिवर्तनाच्या चौकटीत पाहू नये. ओबामांचा विजय म्हणजे अमेरिकन जनतेने नव्या पीढीवर दाखवलेले एक विश्वासाचे प्रतिक आहे. त्यामुळे नव्या युगातील भारताला आता गरज आहे ती अशाच नव्या उमेदीच्या तरूण नेतृत्वाची आणि भारतीयांना त्यावर विश्वास दाखवण्याची.

Wednesday, October 29, 2008

समाजवादी भांडवलशाहीच्या मार्गावर अमेरिका

जगात भांडवलवादाचं जाळं पसरवणा-या अमेरिकेलाच या भांडवलवादानं मंदीच्या रुपात एक जबरदस्त चपराक लावली आहे. आणि हाच धागा घेवून काही दिवसांपुर्वी मी 'भांडवलवाद कोसळला रे' नावाचा एक विचार मांडला होता. मात्र कोसळणे या शब्दावर माझ्या एका मित्रानं आक्षेप नोदंवत कोणतीही व्यवस्था कधीच कोसळत नसते, असं त्यांचं म्हणण आहे. मात्र माझादेखील त्यांच्या या विचारावर आक्षेप आहे. कारण ते म्हणतात की "मार्क्सवादावर आधारलेली काही देशातली शासन व्यवस्था कोसळली की मार्क्सवाद संपला असं म्हणता येईल का, मार्क्सवाद अजून आहेच, की तो कसा संपेल, ". मात्र मला यात थोडीशी सुधारणा करावीशी वाटते. सोव्हीएत संघाची शकलं होण्याआधी संघाची व्यवस्था पुर्णपणे मार्क्सवादावर आधारलेली होती. ती त्या तत्वानुसार प्रत्यक्षात राबवली जायची. मात्र सोव्हीएत संघाचं विघटन झाल्यानंतर या व्यवस्थेचं स्वरूप बदलत गेलं. मार्क्सवादातली काही धोरणं समाजाला पोषक आणि उपायकारक असल्यामुळं ती तुलनेनं लवचिक असलेल्या समाजवादानं अंगिकारली. बदलता काळ आणि बदलत्या गरजा लक्षात घेवून वाकवला तेवढा वाकेल असा सोयीचा समाजवाद जन्माला घातला गेला. आणि मार्क्सवाद हा केवळ एक विचार म्हणूनच अस्तित्वात राहीला. कारण सोव्हीएत संघाच्या विघटनातून मार्क्सवादी धोरण अवलंबणा-या सर्वच राष्ट्रांनी धडा घेतला. आणि पुढच्याला ठेच, मागचा शहाणा हे तत्व अंगिकारत समाजवादाच्या नावाखाली आपल्या धोरणांमध्ये लवचिकता आणली. जगाच्या पाठिवर आज कोणतं राष्ट्र मार्क्सवादी धोरणांची आणि तत्वांची पुर्णपणे अंमलबजावणी करत आहे ? कोणतही नाही. क्यूबापासून व्हिएतनामपर्यंत आणि रशियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत सर्वांनी मार्क्सवादाचा विचार सोडला नसला तरी आचार सोडला आहे. त्यामुळं मार्क्सवादावर आधारलेली अर्थव्यवस्था आज जगात अस्तित्वात नाही. हेच सत्य आहे. आता ती फक्त मोठमोठ्या चौकौनी ग्रंथांमध्येच आढळून येते. म्हणजे याचाच अर्थ असा की तुम्हाला एखादी व्यवस्था पुर्णपणे ‘नष्ट’ (संपण्या) होण्यापासून वाचवायची असेल तर ती ‘कोसळल्या’ नंतर तिच्यात बदलत्या काळानुसार योग्य त्या सुधारणा करणं आवश्यक असतं. पुढं त्यांचं म्हणण असं आहे की, “तसच भांडवलवादाचंही आहे तो कसा कोसळेल किंवा संपेल, काही देशातल्या काही बँका म्हणजे भांडवलवाद नाही ना”. अगदी बरोबर काही देशातल्या काही बँका म्हणजे भांडलवाद मुळीच नाही. हा झाला आदर्श विचार किंवा आदर्शवाद. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटलावरचं वास्तव चित्र काही वेगळचं आहे. जगातल्या सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त देशांमध्ये अमेरिकेनं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शिरकाव केला आहे. नुसता शिरकावच नाही तर या उभय देशांच्या अर्थव्यस्थेला बळकट करण्यात त्यांनी हातभार लावला आहे. इथं मला एक मजेशीर उदाहरणाचा उल्लेख करावासा वाटतो. व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकन राष्ट्राचा सर्वात मोठा शत्रू अमेरिका आहे. मात्र या राष्ट्राचा सर्वात जास्त व्यापारदेखील अमेरिकेबरोबर चालतो. हा जगातला सर्वात मोठा विरोधाभास असू शकतो. त्यामुळंच अमेरिकेतील शंभर ते दिडशे वर्षांची परंपरा असलेल्या खासगी बँका दिवाळखो-यात निघतात तेव्हा जगातले सर्वच देशांचे शेअर बाजार पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळतात. तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने व्याजदरात कपात केली की अशियाच्या बाजारात तेजी येते. याला काय म्हणायचं ? आता उरला प्रश्न तो भांडवलवाद कोसळण्यावरच्या आक्षेपाचा.......बियर स्टर्न्स (1923), लेहमन ब्रदर्स(1850), मेरील लिन्च(1914), जे पी मॉर्गन(1824), गोल्डमन सॅश(1869), अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप(1919,जगातली सर्वातमोठी विमा कंपनी) या जागतिक स्तरावरच्या सर्व वित्त संस्था अती नफा कमावण्याच्या भांडवलवादी धोरणामुळं दिवाळखोरीत निघाल्या. मात्र त्याची झळ अमेरिकेतील सामान्य नागरिकाला बसू नये यासाठी गेल्या कित्तेक वर्षांपासून खासगिकरणाचं एकांगी धोरण अंगिकारणा-चा अमेरिकन सरकारला हस्तक्षेप करावा लागला. सुरवातीला सरकारनं एकट्या एआयजीला वाचवण्यासाठी सात लाख कोटी डॉलर मदतीची घोषणा केली. मात्र एवढ्या मोठ्या मदतीनंतरही परिस्थिती हाताबाहेर असल्याचं जाणवताच सरकारनं खासगिकरणाच्या पारंपारिक धोरणाला सुरूंग लावत या कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्य़ा. थोडक्यात त्यांचं (बँकांचं) राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजेच समाजाला शाश्वत अशी आर्थिक सुरक्षा देण्यासाठी भांडवलवादावर पोसलेल्या खासगिकरणाच्या धोरणाला काहीशी बगल देऊन समाजवादी पाऊल टाकावं लागलं. मात्र अमेरिकन सरकार हे अधिकृतरीत्या मान्य करायला तयार नाही. कसं करणार ? समाजादाचा तिरस्कार त्यांच्या रक्तातच असल्यामुळं तो एवढ्या सहजपणे स्विकारणं त्यांना शक्य नाही. मात्र निव्वळ भांडवलवादी आणि खासगिकरणाच्या धोरणावर म्हणजेच सरकारचं नियंत्रण नसलेली अर्थव्यवस्था उभी करणं किती धोक्याचं असतं हे त्यांना आता कळू लागलंय. म्हणूनच नवीन समाजवादी भांडलवादाच्या (Neo Socio Capitalism) वाटेनं आता अमेरिका वाटचाल करू पाहत आहे. म्हणजेच आत्तापर्यंत वेगानं धावत असलेल्या मात्र अचानक ब्रेक लागलेल्या अमेरिकन भांडवलवादाच्या एक्सप्रेसला यापुढे सुरक्षित धावण्यासाठी समाजवादाच्या इंधनाची गरज भासू लागली आहे. त्यामुळे संपुर्णपणे भांडवलवादावर आधारलेली नियंत्रित अर्थव्यवस्था कोसळण्याची आणि काही समाजवादी धोरणं अंगिकारून ती नियंत्रित करण्याची अमेरिकेची ही सुरूवात आहे.

Saturday, October 18, 2008

काव्यगत न्यायातून रशियाने बोध घ्यावा


एकेकाळी सोव्हीएत रशियाचा अविभाज्य घटक असणा-या जॉर्जियाच्याच विरोधात रशियाचं धोरण कधी नव्हे ते इतके आक्रमक झाले. त्यासाठी रशियानं सा-या युरोप खंडाच्या विरोधातच शड्डू ठोकले आहेत. रशियाच्या उद्दामपणाच्या वागण्याला जबाबदार आहे तो त्यांच्या 'नॉस्टेलजिया'. नेमाडेंच्या भाषेत म्हणायचे झाले तर हा एक रोग आहे. आणि तो आता रशियाला जडलेला आहे. या रोगाचा इतिहासाशी फार जवळचा संबंध आहे. जगाच्या एक तृतियांश भुभागावर आपलं अधिराज्य गाजवणा-या सोव्हीएत रशियाची शकलं झाली ती तात्कालीन अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांच्या कार्किर्दीत म्हणजे 1991 मध्ये. आणि गोर्बाचेव्ह यांनाचं या महाकाय देशाच्या विभाजनाला जबाबदार धरण्यात आले. त्यांच्या कचखाऊ धोरणामुळेच सोव्हीएत संघ लयास गेल्याचे आरोप त्यांच्यावर केले गेलेत. मात्र त्यांची राजकीय प्रगल्भता आणि त्यांच्या शांतताप्रिय धोरणामुळं सोव्हीएत रशियाच्या इतिहासात एक सोनेरी पर्व लिहीले गेले. ते म्हणजे 'ब्लडलेस रिव्हॉल्युशन'. या एका अवाढव्य राष्ट्राने पंधरा नवीन राष्ट्रांना जन्म दिला. मात्र सोव्हीएत संघाच्या एकाही नागरिकाला आपल्या प्रांताच्या सार्वभौमत्वासाठी रक्ताचा एकही थेंब सांडावा लागला नाही. कदाचीत जगाच्या इतिहासातली ही एकमेव घटना होती, अजूनही आहे आणि सार्वभौमत्वाच्या तसेच स्वातंत्र्याच्या मुद्यावर तिचा विक्रम मोडणे कोणत्याही राष्ट्राला शक्य नाही. शिस्तप्रिय साम्य़वादी विचारांच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि मानवाधिकारांचे हनन करणा-या या राजवटीचा अंत झाला. येवढेच नव्हे तर या साम्यवादी व्यवस्थेवर पुर्णपणे नियंत्रण ठेवणा-या सोव्हीएतच्या केजीबी या गुप्तचर संस्थेच्या तात्कालिन प्रमुखांचा मास्कोच्या चौकातला भला मोठा पुतळा जनतेच्या उस्फुर्त पुढाकाराने खाली खेचण्यात आला होता. मात्र याच साम्यवादावर टीकेची झोळ उठवून तिचे खरे स्वरूप जगासमोर मांडणा-या अलेक्झांडर सोल्झेनेत्सीन यांना आपल्या मायदेशात सन्मानाची वागणूक देणारे आणि त्यांचा गौरव करणारे तात्कालीन अध्यक्ष पुतिन हे या ऐतिहासीक दिनाची दशकपुर्ती साजरा करण्याचे साधे कर्तव्य पार पाडू शकले नाहीत. याचाच अर्थ असा की गोर्बाचेव्ह यांचा अपवाद वगळता मानवाधिकार, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या पोथीनिष्ठ गप्पा झोडणा-या रशियाच्या कोणत्याही साम्यवादी नेत्यानं या क्रान्तीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले नाही. विचारांचा तेवढा उदारपणा त्यांच्याजवळ कधीच नव्हता. त्यामुळं त्यांना सोव्हीएत रशियाच्या ऐतिहासीक आठवणीत मश्गूल व्हायला आजही आवडते. मात्र वास्तवाचे भान आले की ते निराश होतात. आणि एकेकाळी आपल्या कुटुंबाचे सदस्य असलेल्यांना बळाच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे रशियानं किरगिझस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि ताझिकिस्तान या राष्ट्रांशी सौजन्याचं आणि सौहार्दाचं धोरण अवलंबलं, तसेच इतर लहान भावांविषयी राबवलं असतं तर कदाचित रशियाची ज्येष्ठ बंधूची प्रतिमा निर्माण होऊन एक वेगळा दबदबा निर्माण झाला असता. तसेच नको तिथे नाक खुपसणा-या अमेरिकेलाही उत्तरपुर्व युरोपात थारा मिळाला नसता. मात्र रशियाचे या क्रांतिकडे नकारात्म दृष्टीने पाहणे आणि जॉर्जिया, लॅतव्हीया, युक्रेन, पोलंड, चेचेनिया यांच्याशी वारंवार संघर्षाची भुमीका घेऊन युद्धाची भाषा करणे रशियाच्या प्रतिमेला निश्चितच अशोभनीय आहे. आपण एकसंध राष्ट्र असतांना इतर प्रातांना स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी आढेवढे घेणा-या सोव्हीएत रशियाला आता अफखाजिया आणि ओसेशियाच्या सार्वभौमत्वाचा साक्षात्कार झाला. यापेक्षा मोठा दुटप्पीपणा होणे नाही. या दोन्ही प्रातांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली याच रशियानं जॉर्जियाच्या विरोधात युद्ध पुकारले. नको तेवढे हल्ले चढवले. मात्र सोव्हीएत संघ हा इतिहास आहे. आणि तो इतिहासच राहणार यात तिळमात्र शंका नाही. जर रशिया पुर्व आणि पश्चिम जर्मनीच्या पावलावर पाऊल ठेवून एकसंध होण्याचं स्वप्न पाहत असेल तर ते खोटे आत्मसमाधान असून तो निव्वळ एक भ्रम आहे. कारण दुस-या महायुद्धाचा सुड उगवण्यासाठी रशियानेच जर्मनीची फाळणी केली होती. जर्मनीच्या नागरिकांनी नव्हे. म्हणून जमर्नीच्या विलिनीकरणाची आणि रशियाच्या विभाजनाची प्रक्रिया एकाच वेळी व्हावी हा योगायोग नव्हे तर काव्यगत न्याय आहे. आणि या न्यायातूनच रशियानं बोध घेवून जॉर्जियावरचा अन्याय थांबवावा.

Wednesday, October 15, 2008

भांडवलवाद कोसळला रे......


कॅपिटॅलिझम, कॅपिटॅलिझम आणि कॅपिटॅलिझम या शब्दाला खरी चकाकी लाभली ती पंधरा वर्षापुर्वी सुरू झालेल्या ग्लोबलायझेशनमुळे. या इझमचे सगळ्यांनाच आकर्षण होते. सगळ्या तरूणाईची हौस आणि मौज या शब्दानं गेल्या दशकभर पुरवली. मात्र लेहमन बदर्स, मेरी लिन्च, मॉर्गन बदर्स आणि एआयजीच्या रुपानं अमेरिकेने रुजवलेला आणि मोठा केलेला भांडवलवाद एका झटक्यात कोसळला. आणि या भांडवलवादाच्या नशेत डुबलेल्या भल्याभल्यांची झोप उडाली. रोजगार देण्याच्या नावाखाली मोठ मोठ्या आऊट सोर्सिंगच्या कंपन्या भारतासारख्या विकसनशिल आणि गरीब राष्ट्रांमध्ये आल्या. पदवी पुर्ण होण्याआधीच गलेलठ्ठ पगाराच्या नोक-या तरूणांना मिळू लागल्या. लहान वयात पैशाचं आकर्षण जळू लागलं आणि शिक्षण अर्धवट सोडून एकवीसाव्या शतकातली नवी पिढी खुल्या दिलानं ही रातराणीची नोकरी आरामदायी प्रवासासारखी करू लागली. त्यामुळं उच्च शिक्षणाला आळा बसला. कोण शिकणार? उच्च शिक्षण घेतल्यानंतर येवढाच पगार मिळणार असेल तर शॉर्ट कट सोडून येवढ्या लांब लच्चक प्रवासाची गरजच काय? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र यामागे एक भयानक समांतर अर्थ व्यवस्था काम कतर असल्याचं भल्या भल्यांना लक्षात आलं नाही. या भांडवलवादी राष्ट्रांनी गरीब राष्ट्रांमध्ये रोजगार निर्माण केला खरा, मात्र यांनी दिलेला पैसा यांच्याचसाठी खर्च करण्याचे ठिकाणही यांनी आपल्याच देशात निर्माण केले. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे बडे बडे मॉल्स गल्लो गल्ली उभे राहु लागले. आणि या मॉल्समध्ये वेळे आधी आणि प्रमाणापेक्षा जास्त पैसा कमावणारे कॉल्स सेंटर आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे सॅम(समाधान), सँडी(संदिप), अँडी(अनिरूद्ध) हे वारेमाप खर्च करू लागले. म्हणजे एका हातानं यांनी आपला खिसा भरायचा आणि दुस-या हातानं तो रिकामा करायचा. म्हणजे काय अमेरिकेतून आलेला पैसा मायदेशीच परत जाणार. यांची अर्थव्यवस्था सशक्त आणि खेळती राहण्यासाठी यांनी फक्त आपला वापर करायचा. आपल्याला नको त्या सवयी लावायच्या. नको ते स्वप्न दाखवायचे. मात्र यांनी आर्थिक धोरणात काही चुकीचे बदल केले तर त्याचा फटका सा-या जगाला सोसावा लागतो. मग रिसेशनच्या नावाखाली आऊट सोर्स केलेल्या कंपन्या बंद करायच्या. म्हणजे शेवटी बळी आमचाच द्यायचा. आणि यांनी आपल्या जीवावर कमवलेली माया मात्र यांच्या देशातील संकटात सापडलेल्या कंपन्या आणि रोजगार तारण्यासाठी वापरायची. असं हे अमेरिकन भांडवलवादी धोरण. या धोरणानं आता भारताची अर्थव्यवस्थाही पोखरायला सुरवात केली आहे. हे सत्य स्विकारायला सरकार कितीही आढेवेढे देत असले तरी भविष्यात याचा भोगावा लागणारा परिणाम म्हणजेच याचे उत्तर आणि प्रश्नही असेल. दिड दशकाच्या अत्यल्प काळात या वादाने सा-या जगात नवे वादळासारखे थैमान घातले आहे. त्यामुळे चकचकीत आणि झगमगीत दिसणा-या या अमेरिकन भांडवलवादाचा नव्याने पुनर्विचार होणे गरजेचे आहे.